👉पैसे घेऊनही जमीन खरेदीस देत होता नकार; समजावून सांगितले अन् दिला होकार!_
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
कर्जत – ‘एखाद्याने ३० वर्षांपूर्वी जमिनीचा व्यवहार केला असेल… ठरलेली संबंधित रक्कम देऊनही समोरील व्यक्ती जमीन नावावर करून देत नसेल…आणि त्यासाठी वारंवार बैठकाही बसल्या, अनेकांनी प्रयत्न केले तरीही काहीच उपयोग झाला नसेल…पण हा अर्धवट व्यवहार एका पोलिस अधिकाऱ्यामुळे कागदोपत्री पुर्ण होऊन एखाद्याला ३० वर्षानंतर न्याय मिळाला असेल तर कुणाला आश्चर्य वाटायला नको..!
हो! ही किमया केली आहे कर्जतचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी. त्याचे झाले असे ३० वर्षांपूर्वी लाला प्रभु गोरे (रा.कर्जत) यांनी एका इसमाकडून १४ हजार रुपयांना ५ गुंठे जागा विकत घेण्याचे ठरले होते. ठरलेली रक्कमही देण्यात आली मात्र जागा नावावर करून देण्यासाठी त्याने आजतागायत टाळाटाळ केली.त्यानंतर अनेक बैठका घेऊन अनेकांनी मध्यस्ती केली मात्र भल्याभल्यांना कसलाच तोडगा काढता आला नाही. (दि.३० जून २०२१) रोजी लाला गोरे यांनी आत्महत्या केली.त्यानंतर सदर इसमाने ही जमीन दुसऱ्याच व्यक्तीला खरेदी करून दिली होती. मयत लाला गोरे यांचा मुलगा मनोज गोरे यांनी याबाबत तक्रार दिली.त्यानंतर पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी संबंधित इसमाला पोलीस ठाण्यात बोलावून ती जमीन तुम्ही रितसर गोरे यांना खरेदी करून द्या असे समजावून सांगितले अन्यथा तुमच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे सांगितले. त्याचवेळी समोरील इसमाने ती जमीन लाला गोरे मनोज गोरे यांच्या नावावर करून देतो असे सांगितले आणि त्याने कर्जत न्यायालयाजवळील ५ गुंठे जागा ही गोरे यांच्या नावे करून दिली आहे.
३० वर्षांपासून अडकलेला हा व्यवहार पोलीस निरीक्षक यादव यांनी मार्गी लावल्याने मनोज गोरे यांनी पोलीस प्रशासनाचे विशेष आभार मानले आहेत.ही कारवाई पोलीस अधिक्षक मनोज पाटील,अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल,उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,पोलीस अंमलदार सलिम शेख, मनोज लातूरकर, अमित बर्डे, शाहूराज तिकटे आदींनी केली आहे.
👉आपल्या कामातून संपादन केला विश्वास!*
“पोलीस अधिकारी म्हटलं की, कायदा सुव्यवस्था अबाधित ठेऊन नागरिकांना न्याय मिळवून देणं हे सर्वसृत आहे.मात्र हे काम उत्कृष्ट करून चौकटीबाहेर येऊन गोरगरिबांच्या आणि सर्वसामान्यांच्या अडचणी जेव्हा अधिकारीच सोडवतो तेंव्हा सर्व स्तरातून कौतुक होते. हाच विश्वास चंद्रशेखर यादव यांनी कमी कालावधीत संपादन केला आहे”