संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
शिर्डी – हातात पेन घेऊन कागदावर बातमी लिहिण्याचे दिवस आता संपले असून, पत्रकारांनी काळाबरोबर स्वतःला अपग्रेड केले पाहिजे, सध्याचे युग डिजिटल मीडियाचे असून, फाईव्ह जी सुरु झाल्यानंतर मीडियात आणखी क्रांतिकारक बदल होतील, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार सुनील ढेपे यांनी येथे केले.
महाराष्ट्र पत्रकार संघाचे १८ वे अधिवेशन शिर्डी येथे पार पडले. यावेळी ‘डिजिटल मीडिया – पत्रकारासाठी एक संधी’ या विषयावर ढेपे बोलत होते. व्यासपीठावर पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष विलासराव कोळेकर, माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे – पाटील , माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे , साधना न्यूज चॅनलचे कार्यकारी संपादक पुरुषोत्तम सांगळे , भाजपचे प्रवक्ते आणि माजी न्यूज अँकरअजित चव्हाण आदी उपस्थित होते.
कागदाचे वाढलेले भाव आणि एकदंरीत खर्च यामुळे येत्या तीन वर्षात अनेक वृत्तपत्रे बंद पडून त्याची जागा ईपेपर घेतील, पण यापुढे ईपेपर वाचण्यासाठी पैसे मोजावे लागतील. सध्या चालू असलेल्या न्यूज चॅनलला देखील घरघर लागेल आणि स्मार्ट टीव्हीच्या माध्यमातून अनेक डिजिटल चॅनल उदयास येतील. डिजिटल मीडिया हेच भविष्य असल्याने पत्रकारितेत कार्यरत असलेल्या प्रत्येकाला डिजिटल मीडियाचे सर्व ज्ञान असायला हवे, असेही ढेपे यांनी सांगितले.
यावेळी बोलताना पत्रकार पुरुषोत्तम सांगळे म्हणाले की, सोशल मीडियामुळे पत्रकारांची मक्तेदारी संपली असून, आज प्रत्येकजण पत्रकार झाला आहे.मालक लोकं जोपर्यंत पत्रकारांच्या हिताचा विचार करत नाही, तोपर्यंत पत्रकारांच्या पोटापाण्याचा मूळ प्रश्न सुटणे अवघड आहे.त्रकारांचा प्रतिनिधी विधिमंडळात गेला पाहिजे, पण त्यासाठी राज्यातील दोन लाख पत्रकार एकत्र यावे लागतील. पत्रकार संघटनांचे सवतेसुभे मोडित काढावे लागतील.
या अधिवेशनास राज्य संपर्कप्रमुख संजय नवले , नगर जिल्हा पत्रकार संघाचे सचिव हरिभाऊ मंडलिक , अकोला तालुका अध्यक्ष भाऊसाहेब वाकचौरे संगमनेर तालुका प्रमुख अनिल शेठ चांडक,बाबासाहेब राशिनकर आदी उपस्थित होते.