👉खटले मागे घेण्यासाठी पोलीस स्थानकात अर्ज करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर – राजकीय व सामाजिक आंदोलनातील प्रलंबित खटलेमागे घेण्यासाठी स्थापन जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली.
या बैठकीत मध्ये एकूण ७ खटले निर्णय कामी ठेवण्यात आले होते. त्यापैकी ४ खटले पात्र करण्यात आले असून ३ खटले शासनाच्या अटी शर्तीमध्ये बसत नसल्याने अपात्र करण्यात आले आहे.
ज्या कोणी इसमांवर राजकिय व सामाजिक आंदोलना संबधीत गुन्हे दाखल आहे. त्याबाबतचे खटले ( दोषारोपपत्र) ३१ डिसेंबर २०१९ पूर्वी न्यायालयात दाखल असून अदयापपर्यंत प्रलंबित आहे. असे खटले जिल्हास्तरीय समितीपुढे ठेवून मागे घेण्यासाठी, आपल्यावरील दाखल गुन्हे ज्या पोलिस स्टेशनशी संबधित आहे अशा पोलीस स्टेशनकडे लवकरात लवकर लेखी अर्ज करावे. सदरचे खटले शासननिर्णय निकषामध्ये बसत आहे. अगर कसे या अवलोकन करुन पुढील योग्य तो निर्णय जिल्हास्तरीय समितीत घेण्यात येईल, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी नागरिकांना केले आहे. तसेच ३१डिसेंबर २०१९ ते ३१ डिसेंबर २०२१ दरम्यान ज्या कोणी व्यक्तींवर राजकीय व सामाजिक आंदोलना संबंधित गुन्हे दाखल आहेत. त्यांनी सुद्धा त्या बाबतची माहिती संबंधित पोलीस स्टेशनकडे अर्ज स्वरूपात सादर करावी. पुणतांबाच्या शेतकरी आंदोलन संदर्भात मुंबई येथे झालेल्या बैठकीनुसार पुणतांबा येथील शेतकरी आंदोलनात ज्या शेतकऱ्यांवर राजकीय व सामाजिक स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांनी सुद्धा त्या बाबतची माहिती सादर करण्याचेही आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. राजकीय व सामाजिक स्वरूपाच्या आंदोलनाव्यतिरिक्त इतर प्रकारच्या गुन्ह्यान संदर्भातील इसमांनी अर्ज करू नयेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.या बैठकीला सदस्य सचिव तथा अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, सदस्य तथा सहायक संचालक सरकारी अभियोक्ता राजेंद्र त्रिमुखे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित उपस्थित होते.