👉जिल्हा पोलिस दलातर्फे अंमली पदार्थ विरोधी दिनी जनजागृती
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगरः तरुण वयामध्ये मित्र फार महत्त्वाचे असतात व्यसनाधीन मित्रांची संगत असल्यास तो तरुण लवकर व्यसनाधीन होत असतो. त्यामुळे आयुष्यात वाईट गोष्टींना ठामपणे नाही, म्हणायला शिका. जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडत नसते. यश आणि अपयश हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. अपयश आले म्हणून नैराश्यात जाऊ नका. याउलट अधिक कठोर परिश्रम घेऊन, यश संपादन करा. जेवढा जास्त संघर्ष, तेवढे जास्त उज्वल भवितव्य, असे प्रतिपादन नाशिक परिक्षेत्रचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर- पाटील यांनी केले.
नाशिक परिक्षेत्रचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्या संकल्पनेतून व अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या विशेष पुढाकारातून अहमदनगर जिल्हा पोलिस दलाचे वतीने मंगळवार (ता.५) जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनीनिमित्त जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तोफखाना पोलिस ठाणे, प्रोफेसर चौक, माऊली संकुल, येथे पथनाट्य व माहिती पत्रकाचे वाटप करण्यात आले. पद्मश्री पोपटराव पवार, डॉ. श्री. गिरीष कुलकर्णी, जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल, मानसोपचार तज्ञ डॉ. दिप्ती करंदिकर, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण जिल्हा सल्लागार डॉ. हर्षल पटारे, विद्युलता शेखर पाटील आदी उपस्थित होत्या.
पद्मश्री पवार म्हणाले की, व्यसन लावण्यासाठी काहीजण जाणीवपूर्वक प्रयत्न करतात. अशा लोकांना ओळखता आले पाहिजे. व्यसनांमुळे आयुष्य उध्वस्त होत आहे. हिवरे बाजारमध्ये व्यसनमुक्ती करत असताना आलेले अनुभव ही सांगितले. व्यसनमुक्ती विरोधात तरुणांची मोहीम उघडल्यामुळे ग्रामपंचायत मध्ये आपल्या विरुद्ध काही व्यक्तींनी अविश्वास ठराव आणला होता. परंतु, मोहीम आपण सोडली नाही. सातत्याने दारूबंदीविरोधात मोहीम राबवल्यानेच दारूबंदी करणे शक्य असल्याचे सांगितले.
डॉ. करंदीकर म्हणाले की, व्यसनाधीन व्यक्तीच्या डोक्याच्या केसापासून पायापर्यंतचा प्रत्येक अवयव दुष्परिणाम होत असतो. व्यसनाधीनतेसाठी पैसे मिळण्यासाठी गुन्हेगारी क्षेत्राकडे काहीजण जातात. व्यसनाधीन तरुणांच्या कुटुंबीयांनी जेवढे लवकर शक्य असेल तेवढे व्यसनमुक्ती केंद्रात येऊन मानसशास्त्रीय पद्धतीने उपचार करणे महत्त्वाचे आहे. स्लाईड शोद्वारे व्यसनाचे होणारे दुष्परिणाम व्यसन सोडवण्यासाठी करावे लागणाऱ्या उपाययोजना बाबत ही माहिती दिली.
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण सल्लागार डॉ. हर्षल पठारे म्हणाले, व्यसनाधीन व्यक्तीचे कुटुंब व्यसने सोडवण्यासाठी अंधश्रद्धेतून विविध विधी करतात. शांती करणे, बुवा- बाबांच्या नादी लागणे, त्यांचे अंगारे धुपारे घेणे. परंतु, व्यसनमुक्ती केंद्रात घेऊन योग्य उपचार घेण्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे व्यसनाधीनतेवर योग्य उपचार न झाल्या कुटुंबाचे मोठे नुकसान होत आहे. पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी आभार मानले.