संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर : नेवासा तालुक्यातील वांजोळी गावातील ग्रामसेवका मनमानी कारभार करत असल्याचा आरोप करत त्याविरोधात आज ( दि.29) रोजी ग्रामस्थ आणि पदाधिकारी यांनी सभा घेऊन निषेध व्यक्त केला. ग्रामसेवकांनी घरकुल योजनेचा स्थळ पाहणी अहवाल चुकीचा मांडुन जनतेची दिशाभूल केली असुन पदाधिकारी यांना विचारात न घेताच पात्र/ अपात्र यादी जाहीर केल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. तसेच ग्रामस्थ व पदाधिकारी यांनी ग्रामसेवकांची बदली व्हावी अशी भुमिका घेत ग्रामपंचायतला टाळे ठोकले.
यावेळी वांजोळी सोसायटीचे चेअरमन बद्रीनाथ खंडागळे यांनी गोरगरीब, शेतकरी घरकुल योजनेतुन वंचित न राहावे म्हणुन आग्रही भुमिका घेतली. या माध्यमातून गावात राजकीय गट- तट निर्माण करत असल्याचा आरोप चेअरमन खंडागळे यांनी ग्रामसेवकांवर केला. गोरगरीब नागरिकांना घरकुल मिळावं ही आमची मागणी असताना ग्रामसेवक मात्र गावात राजकारण करत असल्याचा आरोप चेअरमन खंडागळे यांनी केला. तसेच जोपर्यंत व्यवस्थित सर्व्हे होत नाही आणि जाणुन बुजुन अपात्र केलेले लाभार्थी पात्र होत नाही तोपर्यंत ग्रामपंचायतचे संपूर्ण कामकाज ठप्प राहील असं ग्रामस्थ म्हणाले.
यावेळी बद्रीनाथ खंडागळे, सरपंच सोनाली खंडागळे, उपसरपंच मंगेश पागिरे, नवनाथ पागिरे, आप्पासाहेब खंडागळे, उमाजी ससे, आण्णासाहेब दाणी, अशोक खंडागळे, भगवान येळवंडे, हरीभाऊ भवार, महेश काळे आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. याबाबत तातडीने न्याय मिळावा अन्यथा जिल्हा परिषदेवर मोर्चा नेण्याचा इशारा ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी दिला.
दरम्यान, ग्रामसेविका प्रतिक्रिया देताना म्हणाल्या की, सर्व्हे चुकीचा झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे, मात्र अपिलात चुकीच्या गोष्टींची दुरुस्ती करता येईल. त्यावेळी चर्चेतून मार्ग निघेल. सर्व्हे करताना दोन प्रतिनिधी स्थानिक स्तरावर उपस्थित राहावेत अशी आम्ही विनंती केली होती, तसेच ग्रामसभेतही ग्रामस्थांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले. मात्र हे न झाल्याने वरिष्ठांना कळवून अंगणवाडी सेविका व उपलब्ध कर्मचाऱ्यांसह सर्व्हे पूर्ण केला. सदरची यादी अंतिम नसून त्रुटी अपिलात दूर केल्या जातील, असे त्या म्हणाल्या.