महायुतीत फक्त 2 जागांवर तिढा; पाहा कोणता मतदारसंघ कोणाच्या वाट्याला?

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
मुंबई ः लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस राहिले असले तरी अद्याप महाविकास आघाडी तसेच महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. भाजपाने आतापर्यंत 23 उमेदवारांना संधी दिली असली तरी त्यांचे मित्र पक्ष म्हणजेच महायुतीतील शिंदे आणि अजित पवार गटाने अद्यापही एकही उमेदवारी जाहीर केलेला नाही. मात्र महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा जवळपास सुटला असल्याची माहिती मिळत आहे. महायुतीच्या 48 पैकी 46 निश्चित झालेत तर 2 जागांवरून अजूनही तिढा कायम असल्याची माहिती समोर येत आहे.

भाजपाने आतापर्यंत 23 उमेदवारांना संधी दिली आहे, तर काँग्रेसने आतापर्यंत महाराष्ट्रातून 11 उमेदवारांची यादी घोषित केली आहे. त्यामुळे आता महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात 9 ठिकाणी थेट लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस बाकी असताना अद्यापही महाविकास आघाडी तसेच महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. अशातच माहिती समोर येत आहे की, महायुतीच्या 48 पैकी 46 निश्चित झालेत तर 2 जागांवरून अजूनही तिढा कायम आहे. ठाण्यात भाजपाची ताकद असल्याने ते या जागेसाठी आग्रही आहेत, तर ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा गड असल्याने ते ही जागा सोडण्यास तयार नाही. ठाण्याशिवाय नाशिकमध्येही शिवसेना आणि भाजपामध्ये संघर्ष होताना दिसत आहे. मात्र ठाणे आणि नाशिक सोडल्यास इतर जागांवर महायुतीचे जागावाटप निश्चित झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


नाशिक आणि ठाण्याच्या जागेवरून रस्सीखेच
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या ठाण्यात राजन विचारे हे सध्या ठाकरे गटाचे विद्यमान खासदार आहेत. तर या मतदारसंघात भाजपाचे 4 आणि शिवसेनेचे 2 आमदार आहेत. त्यामुळे भाजपाने या जागेवर दावा केला आहे. तर नाशिकची जागा महायुतीतील तिन्ह पक्ष आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत आहेत. शिंदे गटाचे आमदार हेमंत गोडसे यांनी रविवारी ठाण्यात येत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर शक्ती प्रदर्शन करत ही जागा आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आज भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत ही जागा आपल्याकडे ठेवण्यासंदर्भात चर्चा केली. याशिवाय मंत्री छगन भुजबळ यांनीही या जागेची मागणी केली आहे.
महायुतीत असं असेल जागावाटप?
शिवसेना कल्याण, दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, पालघर, मावळ, रामटेक, कोल्हापूर, हातकणंगले, बुलडाणा, शिर्डी, हिंगोली, यवतमाळ वाशिम या जागांवर, तर अजित पवार गट बारामती, शिरूर, नाशिक, रायगड, परभणी (महादेव जानकर) या जागांवर आणि भाजपा इतर सर्व जागांवर लढण्याची शक्यता आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!