संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
मुंबई ः अहमदनगर लोकसभा मतदारसंघात निलेश लंके यांनी भाजपासमोर आव्हान उभे केल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मतदारसंघातील पक्षांतर्गत मतभेद मिटविण्यावर भर दिला आहे. त्यासाठी त्यांनी रविवारी (24 मार्च) भाजपाचे उमेदवार सुजय विखे पाटील आणि माजी मंत्री राम शिंदे यांच्यात एकत्र बैठक घेतली. या बैठकीनंतर दोघांमध्ये दिलजमाई झाली असून राम शिंदे यांनी अंतर्गत वादावर पडदा पडल्याचे सांगत सुजय विखे पाटील यांच्या विजयासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर रात्री उशिरा ही बैठक पार पडली. या बैठकीला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राम शिंदे, अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुजय विखे आणि भाजपा नेते हर्षवर्धन पाटील हेही उपस्थित होते. या बैठकीनंतर राम शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना विविध मुद्यांवर भाष्य केले.
गेल्या अनेक वर्षांपासूनचे विषय होते. या निवडणुकीला सामोरे जायची माझी इच्छा होती. मी भाजपाचा कार्यकर्ता असल्याने, नेतृत्वाने उमेदवारीचा जो निर्णय घेतला, तो मान्य आहे. पक्षाच्यावतीने अबकी बार 400 पारचा नारा दिला आहे. त्यासाठी ही महत्त्वाची बैठक बोलावली होती. माझ्या मनातील प्रश्नांसाठी फडणवीस यांनी यशस्वी मध्यस्थी केली. आपले दुःख जो कुणी समजून घेतोय त्या नेतृत्वाचा आदेश मानला पाहिजे. अहिल्या नगरचा खासदार भाजपाचा झाला पाहिजे. यादृष्टीने बैठक सकारात्मक बैठक झाली असल्याचे शिंदे म्हणाले.
पक्षीय पातळीवर वाद आता मिटले आहेत. वैयक्तिक मतभेद असले तरी निवडणुकीत ते काढायचे नसतात. पक्षाने दिलेला आदेश मानून अबकी बार 400 साठी आम्ही तयार आहोत, असेही राम शिंदे म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा व्हेटो वापरला का? असा प्रश्न विचारण्यात आला असता ते म्हणाले की, असे काही नाही. माझ्यावर व्हेटो वापरायची गरज नाही. पक्षाचे आदेश हे शिरसावंद्य असतात. आजच्या बैठकीत मागील पाच वर्षाच्या काळातील प्रश्नांची चर्चा झाली. आजची बैठक यशस्वी झाली. गळाभेट झाली नाही, मात्र हस्तांदोलन झाले, असेही राम शिंदे म्हणाले.