संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर – शहरात वाढत्या चो-या, घरफोड्या, भुरट्या चो-या, वाहन चो-या, वर्दळीच्या ठिकाणी चैन स्नॅचिंग सारख्या घटना घडत आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाले असल्याने पोलिस प्रशासनाने तातडीने कायदा सुव्यवस्था अबाधित होण्याचे नियोजन करून बंदोबस्त करावा, अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी निवेदनाद्वारे जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे केली आहे.
निवेदनात श्री जगताप यांनी म्हटले की, अहमदनगर शहर हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. शहरात व मुख्य बाजारपेठे तेसच नागरी वसाहतीमध्ये मोठ्याप्रमाणात घरफोड्या, भुरट्या चो-या, वाहन चो-या तसेच वर्दळीच्या ठिकाणी चैन स्नॅचिंग सारख्या घटना घडत आहे. त्यामुळे याबाबत नागरिकांमध्ये मोठ्याप्रमाणात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच हे गुन्हे करणाऱ्यांवरही पोलीस प्रशासनाकडून योग्य ती कारवाई होत नसल्याने पोलीस प्रशासना विषयी नाराजीची भावना आहे. इत्यादी वरील घटनांबाबत मी ही वेळोवेळी स्वतः संपर्क करून किंवा पत्राद्वारे वरील बाबी पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आणल्या होत्या, असे असतानाही अद्यापपर्यंत पोलीस प्रशासनाकडून योग्य ती कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे दिवसांदिवस अशा घटना वाढत आहे. त्यामुळे गुन्हेगारांवर पोलीस प्रशासनाचा जरब राहिला नसल्याचे दिसून येते. यामुळे तातडीने कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाने उपाययोजना करावी.