संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ अंतर्गत अहमदनगर ते भुतेटाकळी (ता. पाथर्डी) या अंतराच्या महामार्गाचे काम नव्या ठेकेदारास देण्यात आले आहे. या रस्त्याचे काम करण्याची ठेकेदाराची पूर्वतयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग नाशिक विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिली आहे.
पाथर्डी तालुक्यातील कुत्तरवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते तुळशीराम अंबादास सानप यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ अंतर्गत नगर- भुतेटाकळी रस्त्याच्या कामाबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांच्याकडे थेट तक्रार केली होती. त्याची दखल घेऊन बांधकाम मंत्रालयाने आधीचे ठेकेदार मे. गॅनन इंकरली कंपनी लि. यांचा करारनामा रद्द केला. उर्वरित कामासाठी इंगवले पाटील कन्स्ट्रक्शन कंपनी, पुणे यांना ठेका देण्यात आला. रस्त्याचे उर्वरित काम ८४ कोटी ३२ लाख रुपयांचे आहे. कराराची रक्कम ६८ कोटी ७६ लाख एवढी आहे. कामाचा कालावधी नऊ महिने दिला आहे, अशी माहिती नाशिक विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी सानप यांना दिलेल्या पत्रात केली आहे.