प्रत्येकाने संस्कृती, सामाजिक मुल्यांची जपवणूक केली पाहिजे – सुवर्णा जाधव
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर – आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजाचा आपण एक भाग असतो, परंतु स्वत:पुरता विचार न करता समाजासाठी आपण योगदान दिले पाहिजे. आपली संस्कृती, सामाजिक मुल्यांची जपवणुक केली पाहिजे. त्यातून एक सदृढ समाजाची निर्मिती होत असते. नि:स्वार्थपणे केलेल्या कार्याची दखल ही घेतली जात असते. सुहास मुळे यांनी नेहमीच समाजातील विविध प्रश्नांसाठी संघर्ष केला आहे, त्यांच्या विविध मागण्यांना समाजानेही पाठिंबा दिला, त्यामुळेच त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील डॉक्टरेट पदवी मिळाली आहे. त्याचप्रमाणे कु.प्रणाली कडूस हीने महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांवर अभ्यासपूर्ण व्याख्यान देऊन शिवाजी महाराजांचा इतिहास नव्या पिढीसमोर ठेवला आणि ती विजेती ठरली हे दोन्ही व्यक्तीमत्व समाजात जागृती करण्याचे काम करत आहे. त्यांच्या कार्याने इतरांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळेल, असे प्रतिपादन नगरसेविका सुवर्णा जाधव यांनी केले.
नंदनवन मित्र मंडळाच्यावतीने नगरमधील सामाजिक कार्यकर्ते सुहास मुळे यांना आंतरराष्ट्रीय डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल व महाराष्ट्राचा महावक्ता स्पर्धेत प्रणाली कडूस हीने राज्यात चौथा क्रमांक मिळविल्याबद्दल नगरसेविका सुवर्णा जाधव यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी युवा सेना जिल्हाप्रमुख विक्रम राठोड, माजी महापौर अभिषेक कळमकर, समता परिषद महानगर अध्यक्ष दत्ता जाधव, मार्गदर्शक संजय जाधव, नगरसेवक मदन आढाव, कपिल जाधव, वैजिनाथ लोखंडे, बाबासाहेब कडूस आदि उपस्थित होते.
सत्कारास उत्तर देतांना सुहास मुळे म्हणाले, आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. राजकीय व प्रशासकीय लालफितीत सर्वसामान्य माणूस भरडला जात आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक नागरिकांनी आपले कर्तव्य समजून या विरोधात आवाज उठविला पाहिजे, आपल्या हक्कासाठी लढले पाहिजे. या ध्येयेने आपण कार्य करत असून, त्यात अनेकजण सहभागी होत आहे. या कार्याची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली याचा आनंद आहे, यातून काही चांगले निर्माण व्हावे,हीच अपेक्षा आहे. आज सत्कार करुन आपल्या कार्याचा जो सन्मान केला, त्यात सर्वांचा वाटा आहे. या सत्काराने आपल्या कार्याने प्रोत्साहन मिळणार असल्याचे सांगितले.
याप्रसंगी विक्रम राठोड, अभिषेक कळमकर, प्रणाली कडूस यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्तविकात दत्ता जाधव यांनी मंडळाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती देऊन, चांगले काम करणार्यांच्या पाठिशी आपण कायम उभे राहू, असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कपिल जाधव यांनी केले तर वैजिनाथ लोखंडे यांनी आभार मानले.