👉पुन्हा भोंग्यांवरून अजान झालीच तर आम्ही पुन्हा दुप्पट आवाजाने मशिदींसमोर हनुमान चालिसा लावू, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
मुंबई – धार्मिक रंग द्याल तर आम्हीही देऊ. पुन्हा भोंग्यांवरून अजान झालीच तर आम्ही पुन्हा दुप्पट आवाजाने मशिदींसमोर हनुमान चालिसा लावू, असा इशारा पञकार परिषदेत राज ठाकरे यांनी दिला आहे.
बुधवार (दि.४) सकाळपासून मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण तापले आहे. पुणे, धुळ्यासह अनेक ठिकाणी मनसैनिकांच्या आक्रमक भूमिकेमुळे तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड केली जात आहे. यापार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. आमच्या आंदोलनामुळे राज्यात आज 92 टक्के मशिदींमध्ये पहाटेची अजान भोंग्यांवरून झाली नाही, असा दावा राज ठाकरेंनी केला.
श्री ठाकरे पुढे म्हणाले, भोंग्यांबाबत आम्ही केवळ कायद्याचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. तरीदेखील आमच्यावरच कारवाई का केली जाते, असा सवाल राज ठाकरे यांनी सरकारला केला आहे. भोंग्यांचा मुद्दा हा धार्मिक नाही. आम्ही सामाजिक भूमिकेतून याला विरोध करत आहे. भोंग्यांचा त्रास सर्वांनाच होतो. त्यामुळे केवळ मशिदींवरील अनधिकृत भोंगे नव्हे तर मंदिरांवरीलही अनधिकृत भोंगे काढावेत, असेदेखील राज ठाकरे म्हणाले.
मुंबईत आज 1440 पैकी 135 मशिदींवर पहाटे 5 वाजेच्या आत भोंग्यांवरून अजान झाली. त्यावर राज्य सरकार कारवाई करणार का, असा सवाल राज ठाकरे यांनी केला. काल आपली मुंबई पोलिस सहआयुक्त विश्वास नांगरे- पाटील यांच्याशी चर्चा झाली. तेव्हा मशिदींच्या मौलवींशी आपली चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, पहाटे 5 च्या आत अजान होणार नाही, असेदेखील विश्वास नांगरे-पाटील यांनी सांगितले होते. मग, अजान कशी झाली, नियम फक्त आमच्यासाठीच आहेत का, असेही प्रश्न राज ठाकरेंनी केले.
मनसेतर्फे भोंग्यांविरोधात करण्यात आलेले आंदोलन आजच्या पुरते मर्यादित नव्हते. जोपर्यंत सर्व मशिदींवरील अनधिकृत भोंगे कायमचे उतरत नाही व ही सामाजिक समस्या कायमची संपत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असेदेखील राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.