दूध भेसळीने कॅन्सर वाढला असून, भेसळ करणाऱ्यांची गय नाही : आयजी बी.जी.शेखर पाटील
अहमदनगरमध्ये सर्वात जास्त ‘मोक्का’ व ‘एमपीडीए’च्या कारवाया
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
श्रीरामपूर : राज्यामध्ये दूध भेसळीमुळे कॅन्सरचे रुग्णांची संख्येने वाढत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत चिंता व्यक्त केली आहे. यामुळे भेसळ करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशाराच नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी.जी.शेखर पाटील यांनी दिला.
महानिरीक्षक पाटील हे श्रीरामपूर येथे शहर पोलिस ठाणे तसेच उपअधीक्षक कार्यालयाच्या तपासणीसाठी सोमवारी आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
एसपी राकेश ओला, अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. स्वाती भोर, उपअधीक्षक डॉ. बसवराज शिवपुंजे, निरीक्षक हर्षवर्धन गवळी उपस्थित होते. शहर पोलिस ठाण्यातील प्रत्येक कक्षाची महानिरीक्षक पाटील यांनी बारकाईने पाहणी केली. कामकाजाची त्यांनी माहिती घेतली.
श्री शेखर पाटील म्हणाले, राज्यातील दुधाचे उत्पादन आणि एकूण संकलन पाहता मोठी तफावत आहे. उत्पादनापेक्षा संकलन दुपटीने होत आहे. याचा अर्थ दुपटीने भेसळ होत आहे.
भेसळखोरांवर कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांच्यावर ‘मोक्का’ची कारवाई करू. नाशिक परिक्षेत्रामध्ये नगर जिल्ह्यात ‘मोक्का’ आणि ‘एमपीडीए’च्या सर्वाधिक कारवाया झाल्या आहेत.
दरम्यान अहमदनगर जिल्ह्याचे कार्यक्षेत्र मोठे आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाच्या दृष्टीने श्रीरामपूर येथे नियंत्रण कक्ष स्थापन व्हावे, ही खूप जुनी मागणी आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक कार्यालय सुरू होऊन अनेक वर्षे झाली. मात्र, नियंत्रण कक्ष होऊ शकले नाही, याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले. त्यावर हा विषय सरकार पातळीवरचा आहे. मात्र, त्या प्रस्तावाचा पाठपुरावा आपण करू, असे बी.जी. शेखर म्हणाले.