संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
दाळ मंडई येथील तिळवण तेली समाज ट्रस्टच्या पदाधिकार्यांची नुकतीच बैठक संपन्न झाली. यावेळी ट्रस्टच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती घेण्यात आली, त्याचप्रमाणे विविध विषयांवर चर्चा होऊन ट्रस्टची पुढील दिशा ठरविण्यात आली. या बैठकीत काही दिवसांपूर्वी ट्रस्टच्या अध्यक्षा सौ.सुनंदा रेवनाथ नागले यांचे निधन झाल्यामुळे ही जागा रिक्त होती. या जागेवर अध्यक्षपदी सागर सुधाकर काळे यांची तर महिला विश्वस्तपदी सौ.शोभना किरण धारक यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी ट्रस्टच्या उपाध्यक्षा सौ.निता लोखंडे, विश्वस्त प्रकाश सैंदर, प्रसाद शिंदे, गोकुळ कोटकर, दत्तात्रय डोळसे, मनोज क्षीरसागर, शशिकांत देवकर, सचिन शेंदूरकर आदि उपस्थित होते. निवडीनंतर बोलतांना सागर काळे म्हणाले, गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे अनेक समस्या उद्भवल्या आहेत. कोरोनामुळे अनेक आप्तस्वकियांचेही निधन झाले तर अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला. अशा परिस्थितीत ट्रस्टच्यावतीने गरजूंना विविध प्रकारे मदत देण्यात आली. त्याच बरोबर सण, उत्सव व पारंपारिक कार्यक्रमांचेही थोडक्यात आयोजन करुन ट्रस्टने चांगले कामकाज केले. आता ट्रस्टच्या अध्यक्षपदीची जबाबदारी माझ्यावर टाकून सर्वांनी जो विश्वास दाखविला तो सार्थ ठरविण्याचा आपण प्रयत्न करु. यापुढील काळात ट्रस्टच्यावतीने सर्वांसाठी विविध उपक्रम राबवून पुन्हा नव्या जोमाने कामकाजास सुरुवात करणार आहोत, असे सांगून सर्वांचे आभार मानले. याप्रसंगी शोभना धारक यांनीही ट्रस्टच्या कार्याचा गौरव करुन ट्रस्टच्यावतीने आपली निवड करुन दिलेली जबाबदारी व्यवस्थीत पार पाडू असे सांगितले. बैठकीचे सुत्रसंचालन प्रसाद शिंदे यांनी केले तर आभार निता लोखंडे यांनी मानले.