संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पाथर्डी – दोन-चार दिवसांपासून सुसाट वारे सुरु झाले असून, यात तालुक्यातील चिंचपुर पांगुळ परिसरात महावितरणच्या वीज वाहक तारांचे झोल असल्याने वीज वाहक तारा एकमेकांशी घासून मोठ्या प्रमाणात शॉर्टसर्किट होऊन ऊस जळण्याचे सत्र सुरूच आहे. यात शनिवारी सायंकाळी जुन्या गावालगत वीज वाहक तारांमुळे झालेल्या शॉर्टसर्किटमुळे माजी सरपंच धनंजय दगडू पा.बडे यांचा साडेसहा एकर क्षेत्रावर असलेला ऊस जळून खाक झाला आहे. सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
कारखाना प्रशासनाच्या हलगर्जीमुळे यावर्षी ऊस तोडणी वेळेवर झाली नाही. परिणामी शेतकऱ्यावर डोक्याला हात लावून बसण्याची वेळ आली आहे. त्यातच शनिवारी (२१मे) रात्री ८.३०वाजेच्या सुमारास ही आग लागली.आग व धुराचे प्रचंड लोट सुरू झाल्याने गावातील लोकांनी जळणाऱ्या उसाकडे धाव घेतली. आगीचा वेग जोरात असल्याने आग आटोक्यात आणणे शक्य झाले नाही. यात बडे यांचा साडे सहा एकर ऊस जळाला. महावितरणच्या या परिसरातील शेतातून विजेचे खांब असून त्यावरील तारांचे घर्षण होऊन आग लागली आहे. महावितरणकडून योग्य देखभाल केली जात नाही. परिणामी अनेक ठिकाणी तारांमध्ये घर्षण होऊन उसाचे पीक ऐन तोडणीस आले असताना विजेच्या शॉर्टसर्किटमुळे डोळ्यादेखत जळून खाक झाल्याने शेतकऱ्यामधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
महावितरणने परिसरातील जिर्ण झालेल्या तारा तत्काळ दुरुस्त कराव्यात. तसेच साखर कारखान्याने वाढीव टोळ्या पाठवून लवकरात लवकर शेतकऱ्यांचा ऊस तोडून न्यावा.चिंचपुर पांगुळ परिसरात ऊस जळण्याची गेल्या काही दिवसातील ही दुसरी -तिसरी घटना आहे.
संकलन-सोमराज बडे