👉शाळा सुरू करण्यापूर्वी ग्रामपंचायतीने ठराव करणे बंधनकारक
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
मुंबई- राज्यातील कोरोनामुक्त क्षेत्रात आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग 15 जुलैपासून सुरू करण्यास राज्य सरकारने बुधवारी परवानगी दिली. मात्र, शाळा सुरू करण्यापूर्वी ग्रामपंचायतीने ठराव करणे बंधनकारक असणार आहे. तसेच ज्या गावामध्ये कमीत कमी एका महिन्यापासून कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नाही, अशाच गावांमध्ये वर्ग सुरू करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. त्याचप्रमाणे मुलांना शाळेत पुन्हा आणण्यासाठी ‘चला मुलांनो शाळेत चला’ ही मोहीम शाळा व्यवस्थापनाकडून राबवण्यात येणार आहे.
शाळा सुरू करण्यासंदर्भात सोमवारी शिक्षण विभागाने काढलेला शासन निर्णय मंगळवारी स्थगित केला. त्यामुळे विद्यार्थी, पालक व शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, शासन निर्णयामध्ये तांत्रिक बदल करत राज्य सरकारने बुधवारी शाळा सुरू करण्याबाबत पुन्हा नव्याने शासन निर्णय काढला. त्यानुसार 15 जुलैपासून राज्यातील ग्रामीण भागामध्ये शाळा सुरू करण्याबाबत शालेय शिक्षण विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार ग्रामपंचायतीने शाळा सुरू करण्यापूर्वी पालकांशी चर्चा करून ठराव करणे बंधनकारक केले आहे. त्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर सरपंचांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शाळा सुरू करण्यापूर्वी शाळेमध्ये मुलांनी यावे यासाठी शाळा व्यवस्थापनाने ‘चला मुलांनो शाळेत चला’ अशी मोहीम राबवावी, अशा सूचना शिक्षण विभागाकडून करण्यात आली आहे.