👉सखल भागातील नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर- भारतीय हवामान विभागाने जिल्ह्यात 11 ते 14 जूलै या कालावधीत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीत नांदुरमधमेश्वर बंधाऱ्यातून 27868 क्यूसेस व भिमा नदीस दौंड पूल येथे 23819 क्युसेस पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. वरील वस्तुस्थिती लक्षात घेता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे जिल्ह्यातील नागरिकांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी तात्काळ सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी केले आहे.
जिल्ह्यात आजपर्यंत 166.3 मि.मी. (37.1 %) पर्जन्यमान झालेले आहे. जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीस नाशिक जिल्ह्यातील विविध धरणाद्वारे सोडलेल्या विसर्गामुळे नांदुरमधमेश्वर बंधाऱ्यातून 27,868 क्युसेस तसेच भिमा नदीस पुणे जिल्ह्यात झालेल्या पर्जन्यमानामुळे दौंड पूल येथे 23,819 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झाल्यास धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन पर्यायाने नदीपात्रातील विसर्गात देखील वाढ होण्याची शक्यता आहे.