👉डॉ. विद्युलता शेखर यांच्यामुळे मुलींच्या स्वप्नांना मिळाले बळ
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर : आदिवासी समाजाच्या ३ मुलींनी १० वीत ९० टक्के गुण मिळवले आहेत. घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने त्यांचे पुढील शिक्षणच बंद झाले होते. नाशिक परिक्षेत्राचे आयजी डॉ. बी.जी. शेखर-पाटील यांच्या पत्नी डॉ. विद्युलता शेखर यांनी या मुलींचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले आहे. या तिन्हीही गुणवंत मुलींचा पोलीस दलातर्फे अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात सोमवारी (दि.१८) आयजी बी.जी.शेखर पाटील यांच्या हस्ते आर्थिक मदत व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, श्रीरामपूर अपर पोलिस अधीक्षक स्वाती भोर व स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटके, दिलासा सेलच्या पोनि पल्लवी देशमुख आदिंसह पोलिस अधिकारी उपस्थित होते.
श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी कोठार या ठिकाणावरील स्वाती व प्रिती चव्हाण या दोन्ही बहिणींनी इ.१० वीत ९० टक्के गुण मिळवले आहेत. त्यांचे वडील भगवान चव्हाण यांनी दुसरा विवाह केला आहे. पहिली पत्नी शोभा चव्हाण यांना घटस्फोट दिला आहे. सध्या त्या मुंबईमध्ये राहून भिक्षा मागून जीवन जगत आहेत. त्यांनी दोन्ही मुलींना शिक्षणासाठी श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण येथे मुलींच्या शासकीय वसतिगृहात शिक्षणासाठी ठेवले. कौटुंबिक परिस्थिती जाणीव ठेवून दोघी बहिणींनी अभ्यासावर लक्ष केंद्रित केले आहे. सेतू फाऊंडेशनच्या मृणाली राडकर, मीनल झांबरे, वंदना व्यास यांनी या मुलींना माध्यमिक शिक्षणासाठी मदत देत, मानसिक व भावनिक आधार दिला.
पारधी समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी कार्य करणारे आदिवासी पारधी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित भोसले, राहुल भोसले, आणि आनंता झेंडे, मिथुन चव्हाण यांनी या मुलींना अहमदनगर येथे आरोपी पुनर्वसन आणि शरणागती मेळाव्यात घेऊन आले. डॉ. शेखर कुटुंबास या मुलींची कौटुंबिक परिस्थिती सांगितली. यावेळी एकक्षणाचाही विचार न करता सौ. डॉ. विद्युलता शेखर यांनी या ३ मुलींचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारलच, तसेच पुढील उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक मदत करणार आहेत.
दरम्यान स्वाती चव्हाण हिने न्यायाधीश होण्याचे स्वप्न सांगितले. तर प्रिती हिने डॉक्टर होण्याचे स्वप्न व साक्षी गोटीराम भोसले (रा. घारगाव) हिने प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न.
डॉ. बी. जी. शेखर हे नाशिक येथे सेवेत असताना, डॉ. विद्युलता शेखर यांनी तेथे सामाजिक बांधिलकी जपली आहे. नाशिक येथील अनाथ मुलांच्या वसतिगृहात त्या गणित, विज्ञान हे विषय तेथील मुलांना शिकवत असत. अवघड असलेले हे दोन्ही विषय साध्या सोप्या भाषेत समजून सांगण्याच्या त्यांच्या हातोटीमुळे अनेक मुले पदवीपर्यंत शिक्षण घेऊ शकली आहेत.