आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे – सहायक निवडणूक निर्णय अधिकारी माणिक आहेर
राहाता येथे आचारसंहिता सूचना बाबत बैठक
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
शिर्डी : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- २०२४ चा कार्यक्रम जाहिर केला आहे. जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुका शांततेत पार पाडाव्यात या दृष्टीने सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे. असे आवाहन शिर्डी लोकसभा मतदार संघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी माणिक आहेर यांनी केले.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानेआचारसंहितेची अंमलबजावणीच्या सूचनांसाठी शिर्डी लोकसभा मतदारसंघातील नियुक्त अधिकारी – कर्मचाऱ्यांची राहाता तहसील कार्यालयात सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्री. आहेर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शिर्डी पोलीस उपअधीक्षक शिरिष वमने, राहाता तहसीलदार अमोल मोरे, निवासी नायब तहसीलदार हेमंत पाटील, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, शिर्डी नगरपालिकेचे मुख्याधिकारी सतीश दिघे यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते.
प्रांताधिकारी श्री. आहेर म्हणाले की, जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आदर्श आचारसंहितचे अनुषंगाने शासकीय जागेवरील बॅनर, पोस्टर काढण्यात येवून अंमलबजावणी करण्यात यावी. दि महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डिफेसमेंट ऑफ प्रॉपर्टी अॅक्ट 1995 व भारत निवडणूक आयोग, दिल्ली यांनी वेळोवेळी निर्गमीत केलेले आदेश व निर्देश यानुसार विना परवाना खाजगी अथवा सार्वजनिक मालमत्तेवर पोस्टर्स लावणे, घोषणा लिहिणे, निवडणूक चिन्ह लिहिणे, कापडी फलक लावणे, झेंडे लावणे व इतर कारणाने सदर मालमत्ता विद्रुपित करणेवर बंदी घातलेली आहे.
अशा प्रकारे ज्या राजकीय पक्ष उमेदवाराने खाजगी अथवा सार्वजनिक मालमत्ता विद्रुपित केली असेल त्यांनी अशी पोस्टर्स, भित्ती पत्रके, घोषणा, झेंडे, कापडी फलक, व चिन्ह इ. काढून टाकण्याची तातडीने व्यवस्था करावी. दि महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डिफेसमेन्ट ऑफ प्रॉपर्टी अॅक्ट 1995 अन्वये अशा प्रकारे मालमत्ता विद्रुपित केल्यास 3 महिन्यापर्यंत तुरुंगवास अथवा दोन हजार रुपयांपर्यंत दंड अथवा दोन्हीही शिक्षेस संबंधित इसम पात्र राहील.
यावर्षी मतदानांची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीपद्वारे मोठया प्रमाणात जिल्हाभरात विविध माध्यमांतून जनजागृती करण्यात येत आहे. मेळावे, कार्यक्रम, पथनाट्य, शाळा व कॉलेज मध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी नागरिकांनी भयमुक्त वातावरणात मतदान करावे, असे आवाहन ही श्री.आहेर यांनी यावेळी केले.