संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर- अहमदनगर शहरातील सीना नदीच्या पुर नियंत्रण रेषेबाबत फेर सर्वेक्षण करून बदल करावेत, अशी मागणी जलसंपदा व लाभक्षेत्र विकासमंञी जयंत पाटील यांच्याकडे आमदार संग्राम जगताप यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
अहमदनगर शहर हे ऐतिहासिक शहर असून या शहराची स्थापना पाचशे वर्षांपेक्षाही अधिक कालावधीपूर्वी झालेली आहे. तत्कालीन सत्ताधीश अहमदशहा यांनी अहमदनगर हे शहर सीना नदीच्या पूर्व तीरावर वसविले. आता या शहराची वाढ मूळ शहराच्या पश्चिम उत्तर व दक्षिण अशा तीन दिशांना झाली. या वाढीमुळे सीना नदी शहराच्या मध्यभागातून वाहते. अहमदनगर शहरातून वाहणाऱ्या सीना नदीची लांबी तब्बल १४ किमी इतकी आहे. अहमदनगर शहराच्या गेल्या ५०० वर्षांचा इतिहास पाहिला तर शहरात सीना नदीच्या पुरामुळे शहरात मोठी जीवित अथवा वित्तहानी झाल्याची उदाहरणे नाहीत. याचे प्रमुख कारण असे आहे की, या नदीचा उगम शहराजवळच असून हा सर्व दुष्काळी भाग आहे. या नदीच्या पाणलोट क्षेत्रात पाऊसमान खूपच कमी आहे. त्यातच सुमारे १०० वर्षांपूर्वी या नदीवर पिंपळगाव माळवी येथे धरण बांधण्यात आले त्यामुळे पुराचा धोका अजून कमी झाला आहे. वरीलप्रमाणे परिस्थिती असूनही नुकतेच सिंचन विभागाने या सीना नदीच्या पुररेषा आखून त्याप्रमाणे विकास/बांधकाम परवानगी देण्याबाबत सूचित केले आहे. या नकाशांचे अवलोकन करता व त्याविषयी माहिती घेतली असता या प्रस्तावित पुररेषेमुळे शहरातील फार मोठा विकसित आणि विकसनशील भाग बाधित होत आहे, असे आढळून येते. या पुररेषा आता शहराच्या विकास योजना नकाशावर दर्शवण्यात आलेल्या आहेत व त्यानंतर या बाधित क्षेत्रावर (विशेषतः निळ्या रेषेच्या आत) कोणताही विकास/बांधकाम परवानगी मिळणार नाही, असे सांगण्यात आले. परंतु त्यापूर्वी सुमारे ३० हजारापेक्षा जास्त घरांना महापालिकेची परवानगी आहे. आता त्या घरांनाही पुराचा धोका निर्माण झाल्याची बाब समोर आली आहे. हा नगरकरांवर फार मोठा अन्याय आहे. ही पुर नियंत्रण रेषा दोन्ही बाजुनी मोठ्याप्रमाणात आतपर्यंत दर्शवल्याने अहमदनगर शहराचा फार मोठा भु-भाग बाधित आलेला आहे. आणि त्याचा शहराच्या विकासावर गंभीर परिणाम होणार आहे. त्यातच शहराच्या पूर्वेस असणाऱ्या केंद्र शासनाच्या संरक्षण विभागाने त्यांच्या क्षेत्रालगत असलेल्या जमिनीवरील विकासावर अनेक निर्बंध लादलेले आहेत. तसेच शहरात काही संरक्षित ऐतिहासिक वास्तू आहेत. या वास्तुपासून ३०० मी अंतरावर बांधकाम करण्यास अनेक निर्बंध आहेत. त्यातच आता या नव्या फार मोठ्या क्षेत्रावर नवे निबंध येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील एकूणच विकासार अत्यंत प्रतिकूल परिणाम होणार आहे. तसेच अनेक शेतकरी व नागरिक या निर्णयामुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. तरी अहमदनगर शहरातील सीना नदीच्या पुर नियंत्रण रेषेबाबत फेर सर्वेक्षण करून बदल करणेबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनात श्री जगताप यांनी म्हटले आहे.