संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर : सेवेत असताना गैरवर्तन, कामात अनियमितता व अन्य कारणामुळे नगर जिल्ह्यातील दहा ग्रामसेवकांवर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी कारवाई केली आहे. त्यात एका ग्रामसेवकाला सेवेतून बडतर्फ एक जणास सक्तीची सेवानिवृत्ती, पाच जणांचे वेतनवाढ बंद, तर तिघांना निलंबित करण्यात आले आहे.
ग्रामीण भागात काम करीत असताना ग्रामसेवकांना जनसेवा करत सरकारी निधीचा योग्य प्रकारे विनियोग करणे गरजेचे आहे. मात्र, काही ग्रामसेवकांकडून निधीचा गैरवापर करणे, कामांत अनियमितता असणे असे प्रकार होतात. तक्रार दाखल असलेल्या ग्रामसेवकांची चौकशी करून तक्रारीत तथ्य आढळल्याने गायकवाड जळगाव (ता. शेवगाव ) येथील तत्कालीन ग्रामसेवक आर. बी. काळे यांना गैरवर्तनाबाबत बडतर्फ केले आहे.
वडगाव तनपुरा, (ता. कर्जत) येथील तत्कालीन ग्रामसेवक यांना गैरवर्तनाबाबत सक्तीने सेवानिवृत्त केले आहे. मिरी (ता.पाथर्डी) येथील तत्कालीन ग्रामवेसक ज्ञा. गो. सोनवणे यांच्या चार वेतनवाढी कायमस्वरूपी बंद केल्या आहेत. हळगाव (ता. जामखेड) येथील तत्कालीन ग्रामसेवक आ. दा. आखाडे यांच्यावर अनियमितता व गैरहजर प्रकरणी दोन वेतनवाढी कायमस्वरूपी बंद केल्या आहेत. लोणी खुर्द (ता. राहाता) येथील तत्कालीन ग्रामविकास अधिकारी शि. बु. सुरे यांच्यावर गैरवर्तन प्रकरणी दोन वेतनवाढी कायमस्वरूपी बंद केल्या आहेत. बोधेगाव (ता. राहुरी) येथील तत्कालीन ग्रामसेवक आर. व्ही. बर्डे व माळी चिंचोरे (ता. नेवासा) येथील तत्कालीन ग्रामविकास अधिकारी ब. तु. शेटवाड यांची एक वेतनवाढ कायमस्वरूपी बंद केली आहे.
याशिवाय आर्थिक अनियमितता, गैरहजेरी, संशयित अपहार व अन्य कारणाने खुरदैठण (ता. जामखेड) येथील ग्रामसेवक इम्रान शेख, दिघी (ता. कर्जत) येथील ग्रामसेवक महादेव ढाकणे व काळेगाव (ता. शेवगाव) येथील ग्रामसेवक श्रीमती श. यु. पठाण यांच्यावर सेवानिलंबन केल्याचे केला आहे अशी माहिती जिल्हा परिषदेतून देण्यात आली.