संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर – केंद्र पुरस्कृत जलशक्ती अभियान ‘कॅच द रेन’ उपक्रमांतर्गत जिल्ह्यात विविध विभागाने केलेल्या कामांचा लेखाजोखा घेण्यासाठी सोमवारी केंद्रीय पथक येत आहे. ४ जुलै ते ६ जुलै २०२२ या तीन दिवसांच्या दौऱ्यात जिल्ह्यातील काही गावांना भेट देऊन बैठकांद्वारे नदी, नाल्यांच्या खोलीकरणासह जलसंधारणाच्या कामाची पाहणी केंद्रीय पथक करणार असल्याची माहिती जिल्हा जलसंधारण अधिकारी मनोज ढोकचौळे यांनी दिली आहे.
नवी दिल्ली येथील केंद्रीय गृह मंत्रालयाचे उपसचिव राहूल मलिक व तंत्रज्ञान अधिकारी डॉ.एस.आर.स्वामी या दोन सदस्यांचा केंद्रीय पथकात समावेश आहे. जिल्ह्यातील विविध विभागाद्वारे जलशक्ती अभियान अंर्तगत करण्यात आलेल्या कामांचा आढावा हे पथक घेणार आहे. जलशक्ती अभियान ही एक कालबध्द मोहीम आहे. २९ मार्च ते २० सप्टेबर २०२२ असा या अभियानाचा कालावधी असून जलशक्ती अभियान हे प्रामुख्याने पाच घटकांवर आधारीत आहे. त्यात जलसंधारण आणि पावसाचे पाणी, साठवण, पारंपरिक आणि इतर जलस्त्रोत तसेच मुख्य जलसाठ्याचे नूतनीकरण, जल संरचनेचा पुनर्वापर आणि पुनर्भरण, पाणलोट क्षेत्र विकास करणे, संघ वनीकरण यांचा समावेश आहे.
👉असा आहे अभियानाचा उद्देश
जलशक्ती अभियानांतर्गत २०२२ मध्ये पावसापासून उपलब्ध पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे जतन करणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे. या अभियानांतर्गत छतावर पडणाऱ्या पावसाचे पाणी साठविण्यासाठी इमारतीवर रेन वॉटर हार्वेस्टिंगची बांधकामे करणे, इमारतीच्या आवारामध्ये पावसाचे पाणी मुरविण्यासाठी शोषखड्डे घेणे, अस्तित्वातील जलसंधारणाची बांधकामे सुव्यवस्थित ठेवणे व त्याची नियमित देखभाल करणे, साठवण बंधारे व तलाव बांधणे, पावसाचे पाणी साठवण्याच्या पारंपरिक साठ्यांचे पुनरुज्जीवन करणे, जलसाठे व जलसंधारणाची कामांतील तसेच त्यांच्या पाणलोट क्षेत्रातील अतिक्रमण दूर करणे, तलावातील गाळ काढणे, विंधन विहिरींचे पुनर्भरण व पुनर्वापर करणे, पाणलोट क्षेत्र विकास, छोट्या नद्या-नाले, ओहोळ, ओढ्यांचे पुनरुज्जीवन करणे, पानथळ जमिनीचे संरक्षण करण्याचा समावेश आहे.