कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सुरुवातीला १५ टक्के बदल्यांना मान्यता दिली होती.
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाइन नेटवर्क
मुंबई -राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या करण्यासाठी सरकारने ९ ऑगस्ट २०२१ पर्यत मुदवाढ दिली आहे. ९ जुलैच्या शासन निर्णयानुसार बदल्यांसाठी ३१ जुलै ही शेवटची मुदत होती. सामान्य प्रशासन विभागाने गुरुवारी यासंदर्भातील निर्णय जारी केला. आता नव्या निर्णयानुसार विशेष बदल्यांनाही मुदतवाढ मिळाली आहे. सर्वसाधारण बदल्यांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर म्हणजे १० ऑगस्ट २०२१ ते ३० ऑगस्ट २०२१ या दरम्यान विशेष बदल्या करता येतील. विशेष बदल्यांसाठी प्रशासनाला लेखी कारण नमूद करावे लागणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सुरुवातीला १५ टक्के बदल्यांना मान्यता दिली होती. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या विनंतीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १५ ऐवजी २५ टक्के बदल्यांना मान्यता दिली. ही मान्यता देताना ३१ जुलैची मुदत कायम होती. मात्र, राज्यावर अतिवृष्टी, पूरपरिस्थिती अशी नैसर्गिक आपत्ती आल्याने अनेक मंत्री मदत कार्यासाठी आपापल्या जिल्ह्यात अडकून पडले होते.या पार्श्वभूमीवर सर्वसाधारण आणि विशेष बदल्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला.