संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
मुंबई – राज्यातील सत्तांतराच्या नाट्यानंतर आज विधानसभा अध्यक्षपदाची पहिली लढाई भाजप व शिंदे गटाने जिंकली. भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांनी 164 मते मिळवत ही निवडणूक जिंकली. तर, मविआच्या राजन साळवींनी 107 मते मिळवता आली. विधान परिषदत निवडणुकीत शिवसेनेला मतदान करणाऱ्या एमआयएमनेही मविआच्या उमेदवाराकडे पाठ फिरवली. सपा आणि एमआयएमचे मिळून तिघे आमदार तटस्थ राहीले. शिवसेनेचे आमदार सभागृहात बंडखोर शिवसेना आमदारांशी भिडतील, अशी शक्यता होती. पण सभागृहात असे काहीही घडलेले नाही. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडली.
विधिमंडळ अधिवेशनाच्या कामकाजाला सकाळी ठीक 11 वाजता ‘वंदे मातरम’ गीताने सुरुवात झाली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवनिर्वाचित आमदारांची सभागृहाला ओळख करुन दिली. मतदानासाठी प्रथम राहुल नार्वेकर यांचा प्रस्ताव भाजपने सादर केला. त्यानंतर आवाजी पद्धतीने मतदान झाले. त्यात नार्वेकर यांना बहुमत मिळाल्याचे चित्र होते. मात्र, आवाजी मतदान पद्धतीलाच मविआने आक्षेप घेतला. त्यामुळे आमदारांची शिरगणती करुन अध्यक्ष निवडला गेला. या प्रक्रियेसाठी विधानसभेच्या सभागृहाचे दरवाजे प्रक्रीया संपेपर्यंत दरवाजे बंद करण्यात आले होते.
शिवसेनेचा व्हीप धुडकावला
मविआचे उमेदवार राजन साळवी यांना मतदान करावे, असा व्हीप शिवसेनेतर्फे आपल्या सर्व आमदारांना बजावण्यात आला होता. मात्र, शिंदे गटाने शिवसेनेचा व्हीप पाळला नाही. शिवसेनेच्या सर्व बंडखोर आमदारांनी भाजप उमेदवार राहुल नार्वेकर यांना मतदान केले आहे. बविआ आणि मनसेच्या आमदारांनाही राहुल नार्वेकरांना मतदान केले. त्यामुळे राहुल नार्वेकर यांनी बहुमताचा आकडा सहज पार केला. अध्यक्षपदासाठी त्यांना 164 आमदारांनी मतदान केले. समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी व रईस शेख तटस्थ राहिले. एमआयएमचे आमदारही तटस्थ राहिले. त्यांनी मविआ उमेदवाराला मत दिले नाही. त्यामुळे मविआ उमेदवार राजन साळवी यांना 107 मतेच मिळवता आली.