राहुरी तालुक्यातील दुहेरी वकील दाम्पत्यांच्या खून प्रकरण सीआयडीकडे वर्ग
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर: जिल्ह्यासह राज्यभरात प्रचंड खळबळ उडवून देणारी घटना राहुरी तालुक्यात घडली. वकील दाम्पत्यांचे अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेबाबत वकील संघाकडून पोलिस तपासाबाबत संशय व्यक्त केला जात होता. त्यामुळे घटनेचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) कडे देण्यात आला.
राहुरी येथील ॲड. राजाराम जयवंत आढाव व त्यांची पत्नी ॲड. मनीषा राजाराम आढाव या वकिल दाम्पत्यांचे दि. २५ जानेवारी २०२४ रोजी अपहरण करुन त्यांचा निर्घृण खून करण्यात आला. या घटनेतील किरण ऊर्फ दत्तात्रय नानाभाऊ दुशिंग (रा. उंबरे), भैया ऊर्फ सागर साहेबराव खांदे (रा. येवले आखाडा), शुभम संजीत महाडिक (रा. मानोरी), हर्षल दत्तात्रय ढोकणे (रा. उंबरे), बबन सुनिल मोरे ( रा. उंबरे) या पाच आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेऊन गजाआड केले. या घटनेतील तीन आरोपींनी तात्काळ राहुरी येथील न्यायालयासमोर कबुली जबाब देऊन गुन्हा कबूल केला. यातील किरण दुशिंग हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी खुनाचे दोन गुन्हे तसेच चोरी, दरोडे, घरफोडी, रस्तालूट, जिवे मारण्याचा प्रयत्न, अपहरण असे अनेक गुन्हे दाखल आहेत. वकील दाम्पत्यांचे हत्याकांड हे २० हजार रुपये फिसाठी झाले. त्यानंतर ५ लाख रुपये खंडणीसाठी झाले. अशी पोलीस प्रशासनाकडून माहिती देण्यात आली. मात्र प्रत्यक्षात आढाव दाम्पत्यांचे मृतदेह मिळून आले. तेव्हा त्यांच्या अंगावर ५ ते ६ लाख रुपयांचे सोन्याचे दागीने होते. त्यामुळे हत्याकांड हे फी किंवा खंडणीसाठी झालेले नसून पोलिस प्रशासनाकडून तपास भरकटण्याचे काम सुरु असल्याचा आरोप वकिल संघाकडून करण्यात आला होता. दि. २९ जानेवारी रोजी नगर जिल्ह्यातील सर्व वकीलांनी राहुरी येथे हजर राहुन तहसील कार्यालयावर मोर्चा काढून निषेध सभा घेतली. तसेच पोलिस तपासा बाबत शंका व्यक्त करून तपास सीआयडीकडे द्यावा, अशी मागणी केली होती.
दि. ३० जानेवारी रोजी या घटनेचा तपास सीआयडी कडे देण्यात आला. आदेशात म्हटले कि, अहमदनगर जिल्हयातील राहुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला गुरंनं ७५/२०२४ भादंवि कलम ३६३, ३०२, २०१ अन्वये दाखल गुन्हयाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) कडे वर्ग करण्यात येत आहे. अप्पर पोलीस महासंचालक यांना विनंती आहे की, त्यांनी वर नमूद गुन्ह्याची संपूर्ण कागदपत्रे केस डायरीसह पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांच्याकडून त्वरित प्राप्त करुन घ्यावीत. गुन्हयाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागा मार्फत शीघ्रतेने पूर्ण करुन सद्यस्थितीबाबतचा अहवाल दि. ५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत या कार्यालयास पाठवावा. तसेच नगर येथील पोलीस अधीक्षक यांनी गुन्हयाची संपूर्ण मूळ कागदपत्रे केस डायरीसह अप्पर पोलीस महासंचालक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडे तात्काळ हस्तांतरीत करावीत. व त्याचा अनुपालन अहवाल या कार्यालयास सादर करावा. असे मुंबई येथील विशेष पोलिस महानिरीक्षक यांनी पारीत केलेल्या आदेश पत्रात नमूद केले आहे. सदर आदेश हे अप्पर पोलीस महासंचालक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे, विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक तसेच नगर येथील पोलीस अधीक्षक यांना पारीत केले आहेत.
त्यामुळे या घटनेत आता सखोल व योग्य रितीने तपास होऊन सदर आरोपींना योग्य ती शिक्षा लागून मयत आढाव दाम्पत्यांला निश्चितच न्याय मिळेल, असा विश्वास राहुरी येथील वकिल संघाकडून व्यक्त करण्यात आला.