संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
मुंबई ः पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तातडीने कारवाई करत भारताने पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून जाण्यास सांगितले होते. त्यासाठी 48 तासांची मुदत देण्यात आली. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेत हे पाकिस्तानी नागरिक वेळेत परत जातील, याची खबरदारी घेण्यास सांगितले होते. त्यानुसार सर्व राज्यांचे मुख्यमंत्री अलर्ट झाले असून पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्याची जबाबदारी अधिकार्यांवर सोपवण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे वेगवेगळ्या राज्यात तसेच महाराष्ट्रात किती पाकिस्तानी नागरिक आहेत, हे समोर आले आहे. महाराष्ट्रात एकूण 5,023 पाकिस्तानी नागरिक असल्याची माहिती मिळाली आहे. यातील 34 हे बेकायदेशीररित्या भारतात राहात असल्याचे समोर आले आहे. ही आकडेवारी सरकारी अधिकार्यांनी दिलेली आहे.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानी नागरिकांना 48 तासात देश सोडण्याचे आदेश दिले. तसेच शॉर्ट टर्म व्हिसावर आलेल्या पाकिस्तानी नागरिकांच्या परतीच्या प्रवासाच्या प्रक्रियेस सुरुवात केली. सरकारी आकडेवारीनुसार, देशात किंवा राज्यात पाकिस्तानी नागरिक जे येतात ते विविध कारणांनी येतात. यात लॉन्ग टर्म व्हिसा, वार्षिक व्हिसा रिन्युअल, पाकिस्तानी पासपोर्ट सरेंडर करून भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करणारे तसेच लग्न करून भारतात राहणार्या अशा नागरिकांचा यात समावेश होतो. याशिवाय, जवळपास 250 पाकिस्तानी नागरिक शॉर्ट टर्म व्हिसावर राज्यात आले होते. या नागरिकांच्या परतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान, जे शॉर्ट टर्म व्हिसावर आले आहेत त्याच नागरिकांना 48 तासात देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर वैद्यकीय व्हिसा 29 एप्रिल पर्यंत वैध असेल.
कोणत्या जिल्ह्यात किती पाकिस्तानी नागरिक
राज्यात सर्वाधिक पाकिस्तानी नागरिक हे नागपुरात राहतात. दुसर्या नंबरवर ठाणे आहे, जिथे 1,106 पाकिस्तानी नागरिक आहेत. मात्र, यात बेकायदेशीररित्या राहणार्या नागरिकांचाही समावेश आहे. तिसर्या नंबरवर जळगाव आहे, तिथे 393 पाकिस्तानी नागरिक राहतात. चौथ्या नंबरवर पिंपरी – चिंचवड (290), त्यानंतर नवी मुंबईचा (239) येतो.
450 हून अधिक भारतीय पाकिस्तानातून मायदेशी
सध्या बंद करण्यात आलेल्या वाघा सीमेवरून गेल्या तीन दिवसात 450 भारतीय पाकिस्तानातून भारतात परतले आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर जी परिस्थिती निर्माण झाली, ती पाहता व्हिसा रद्द झाल्याने हे लोक मायदेशी परतले आहेत. अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी जवळपास 300 भारतीय आणि गुरुवारी 100 भारतीय याच मार्गाने भारतात परतले आहेत. तर दुसरीकडे 200 पाकिस्तानी नागरिक भारतातून पुन्हा पाकिस्तानात परतले आहेत.