संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या समर्थक आमदारांनी बंडखोरी करत महाविकास आघाडी सरकारला सुरूंग लागवल्याने गेले आठ-दिवस महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून गेले होते. काल रात्री उशिरा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर या सर्व नाट्यावर पडदा पडला. आज दुपारी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी सागर या निवासस्थानी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली व नंतर राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी राजभवनाकडे रवाना झाले. आज सायंकाळी सात वाजता शपथविधी होईल, असे सांगण्यात येते. पण त्यांच्याबरोबर कोण-कोण शपथ घेतील, याची उत्सुकता सर्वांना आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडावी, अशी विनंती केली तरी, उद्धव ठाकरे यांनी ती गांभीर्याने घेतली नाही, म्हणून आम्ही आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याची भूमिका बंडखोर आमदारांनी घेतली आहे. भाजपा हा आपला खरा मित्र आहे, असे त्यांचे म्हणणे असल्याने शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील जवळपास 50 आमदारांचा एक गट सत्तास्थापनेत भाजपाला साथ देणार, हे स्पष्ट झाले आहे.