दिल्लीच्या तालावर मान हलवणारे नंदीबैल निवडणून देण्यापेक्षा वाघासारखा लोकप्रतिनिधी निवडून द्या ; खा.अमोल कोल्हे
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी: दिल्लीत ढोलकी वाजली की गुबुगुबू माना हलवणारे नंदीबैल निवडून देण्यापेक्षा सर्वसामान्यांसाठी लढणारे वाघासारखे लोकप्रतिनिधी निवडून द्या, असे आवाहन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे यांनी शेवगाव व पाथर्डी तालुक्यात सुरु केलेल्या युवासंपर्क अभियानाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. या वेळी वाटचाल भविष्याची या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
अमोल कोल्हे म्हणाले की, वंचितांसाठी आपले आयुष्य वेचण्याचे काम स्व. मुंडे यांनी केल्याने पाथर्डी तालुक्यात आलो की त्यांची आठवण आल्याशिवाय राहात नाही. स्व. ढाकणे यांनी तालुक्यात वीज आणण्यासाठी विधानसभेत पत्रके फेकली अन काळाच्या ओघात ते देशाचे ऊर्जामंत्री झाले. हा प्रवास प्रेरणादायी आहे. तुमच्या मनात प्रताप ढाकणे हे आमदार व्हावे, अशी इच्छा असून ती पूर्ण होणार आहे. सध्या केवळ झेंड्याची भाषा वापरली जात असून पोटातल्या भुकेला जात व धर्म नसतो हे त्यांना कळेनासे झाले आहे. आपली अर्थव्यवस्था ही पाचव्या स्थानावर असल्याचे सांगितले जाते. मात्र देशातील ९० टक्के संपत्ती ही १० टक्के लोकांच्या हातात आहे. शेतीमालाला भाव नसल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संसदेत चर्चा करा, अशी मागणी आम्ही केली. तर सुप्रिया सुळे व माझ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
अंधभक्तांच्या टोळीपासून आता आपल्याला देश वाचवायचा असल्याने नवमतदारांनी विचारपूर्वक मतदान करायला हवे. टाटा एअरबस, वेदांतासारखे राज्याच्या ताटातील प्रकल्प गुजरातला नेण्यात आले. मात्र या विषयावर सत्ताधारी खासदार बोलत नाही. कोट्यवधी रुपयांचे रस्ते, पूल, राममंदिर उभारले, याचा आम्हालाही अभिमान आहे. मात्र माणूसही जगला पाहिजे याचा विचार सरकार करत नाही. जाती धर्माच्या नावाखाली जनतेला वेढण्याचे काम त्यांनी सुरु केले आहे. विरोधात कोणी बोलले तर ईडी व सीबीआयचा वापर केला जात आहे. मात्र, याविरोधात ८३ वर्षाचे तरुण नेते शरद पवार लढत आहेत. जे लढतात त्यांचाच इतिहास लिहिला जात असल्याने तरुणांनी लढण्याचे काम करावे, असा सल्लाही कोल्हे यांनी दिला.