एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबरला मतदान अन् 23 ला निकाल
केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त ग्यानेश आणि डॉ. सुखबीर सिंग संधू यांनी जाहीर केल्यानुसार महाराष्ट्रात नोव्हेंबरला निवडणूक होणार असून तारखेला मतमोजणी करण्यात येणार आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यापैकी राज्यात कोण सत्ता स्थापन करणार, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
नवी दिल्ली: केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी आज मंगळवारी (ता. 15 ऑक्टोबर) पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभेची तारीख जाहीर केली आहे. अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे बिगुल नेमके कधी वाजणार, याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. त्यामुळे आता केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त ग्यानेश आणि डॉ. सुखबीर सिंग संधू यांनी जाहीर केल्यानुसार महाराष्ट्रात बुधवार, 20 नोव्हेंबरला निवडणूक होणार असून शनिवार, 23 नोव्हेंबरला मतमोजणी करण्यात येणार आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यापैकी राज्यात कोण सत्ता स्थापन करणार, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकत्रितपणे लढले होते. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचीही युती होती. त्या निवडणुकीत भाजप 105 जागा जिंकून राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील एकसंध शिवसेनेने 56 जागांवर विजय मिळवला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे 54 आणि काँग्रेसचे 44 आमदार निवडून आले होते. त्यानंतर राज्यात राजकारणातील आजवरचे महानाट्य पाहायला मिळाले. सुरुवातीला अडीच वर्ष काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीची सत्ता राज्यात होती. त्यानंतर शिवसेनेत फूट पडल्याने राज्यात मविआचे सरकार कोसळले अन् नव्याने महायुती सरकारची सत्ता स्थापन झाली.
महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. तर 4 जानेवारी 2025 पर्यंत झारखंड विधानसभेची मुदत आहे. परंतु, याच महिन्यात म्हणजे नोव्हेंबरमध्ये दिवाळी आणि छठपूजा हे दोन्ही महत्त्वाचे सण आल्याने महाराष्ट्रात आणि झारखंडमध्येही या सणांच्यानंतरच मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या दोन्ही राज्यांची मतमोजणी 23 नोव्हेंबरमध्येच होईल. परंतु, महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ नोव्हेंबरमध्ये संपुष्टात येणार असल्याने त्यामुळे आता महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यापैकी राज्यात कोण सत्ता स्थापन करणार, हे 20 नोव्हेंबरनंतरच स्पष्ट होईल.