शहरात रमजान ईद उत्साहात साजरी
हजारो मुस्लिम बांधवांनी ईदगाह मैदानावर केली सामुदायिक नमाज अदा
धार्मिक एकात्मता, शांतता व देशाच्या समृध्दीसाठी अल्लाह चरणी प्रार्थना
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहिल्यानगर ः शहरात रमजान ईद (ईद-उल-फित्र) सोमवारी (दि.31 मार्च) उत्साहात व शांततेत पार पडली. सकाळी 10 वाजता ईदची सामुदायिक नमाज कोठला येथील ईदगाह मैदानात अदा करण्यात आली. मौलाना नदिम अख्तर यांच्या मार्गदर्शनाखाली नमाज पठण करण्यात आले. नमाजसाठी शहरातील मुस्लिम बांधव अबालवृध्दांसह हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. रमजानच्या महिन्यात केलेल्या रोजा (उपवासाची) सांगता ईदच्या दिवशी झाली.
रमजान महिन्याच्या 29 उपवासनंतर रविवारी संध्याकाळी चंद्रदर्शन झाल्याने सोमवारी ईद सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील विविध भागातील मशिदमध्ये सकाळी 7 वाजल्यापासून ईदच्या नमाजची व्यवस्था करण्यात आली होती. अनेक मशिदमध्ये मुस्लिम भाविकांनी नमाज अदा केली.
ईदगाहच्या सामुदायिक नमाजनंतर धार्मिक एकात्मता आणि देशाच्या समृध्दी व शांततेसाठी अल्लाह चरणी प्रार्थना करण्यात आली. तर मुस्लिम समाजाच्या वतीने काही युवकांनी वक्फ बोर्ड विधेयकाला विरोध दर्शविणारे फलक झळकावले. ईद शांततेत होण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने ईदगाह मैदान व शहरातील विविध भागात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोठला येथून जाणारी वाहतूक दुसर्या मार्गाने वळविण्यात आली होती. नमाजनंतर शहरातील विविध कब्रस्तान व दर्गामध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. घरोघरी शीरखुर्मा, गुलगुले व बिर्याणीचा बेत होता. रविवारी झालेला गुढी पाडवा व सोमवारी झालेल्या ईदचा उत्साह शहरात दिसून आला. शहरात दिवसभर मुस्लिम बांधवांसह इतर समाजबांधवांनी एकमेकांना भेटून ईदच्या व पाडव्याच्या एकमेकांना शुभेच्छा देत होते. यानिमित्त शहरात सामाजिक एकतेचे दर्शनही घडले.
—
ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी प्रशासनाच्या वतीने कोणतीही व्यवस्था केली गेली नसल्याने मुस्लिम समाजाच्या वतीने नाराजी व्यक्त!
दरवर्षी महापालिकेच्या वतीने ईदगाह मैदान येथे मांडव टाकून शांतता कमिटी सदस्य, पोलीस प्रशासनातील अधिकारी, महापालिका व जिल्हा प्रशासनातील अधिकारी वर्ग नमाजला आलेल्या मुस्लिम बांधवांना गुलाबपुष्प वाटून ईदच्या शुभेच्छा देतात. मात्र यावर्षी कोणत्याही प्रकारची व्यवस्था न केल्याने व शुभेच्छा देण्यासाठी अधिकारी वर्ग देखील उपस्थित नसल्याने मुस्लिम समाजाच्या वतीने नाराजी व्यक्त करण्यात आली.
—